मंडळी 1 मे 2025 हा दिवस देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक नवे आर्थिक आव्हान घेऊन येणार आहे. यापुढे ATM मधून पैसे काढणं किंवा केवळ बॅलन्स तपासणंही ग्राहकांच्या खिशाला महागात पडणार आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दिशेने एक पाऊल टाकताना ATM सेवा आता अधिक खर्चिक होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे 1 मेपासून ATM व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सध्या मोफत मर्यादेनंतर रोख रक्कम काढण्यासाठी 17 रुपये शुल्क आकारले जाते, परंतु आता हे शुल्क 19 रुपये होणार आहे. बॅलन्स तपासणीसाठी 6 रुपये आकारले जात होते, ते आता 7 रुपये होतील. म्हणजे फक्त खात्यात किती पैसे आहेत हे पाहण्यासही पैसे मोजावे लागतील.
मेट्रो शहरांतील ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या ATM वर फक्त 3 मोफत व्यवहार करता येतील. त्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारासाठी 19 रुपये, तर बॅलन्स तपासणीसाठी 7 रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय, ATM सेवा पुरवणाऱ्या बँका एकमेकांकडून ‘इंटरचेंज फी’ घेतात, तीही आता वाढवण्यात आली आहे. याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देखील नवीन अटी जाहीर केल्या आहेत. 1 मे पासून SBI च्या ATM वर 5 आणि इतर बँकांच्या ATM वर 10 मोफत व्यवहार मिळतील. त्यानंतर SBI ATM वापरताना प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये मोजावे लागतील.
ATM व्यवहार महाग होण्यामागे विविध कारणं आहेत. ATM ची देखभाल, रोख व्यवस्थापन, आणि सुरक्षा यावरचा खर्च वाढला आहे. तसेच, सरकार आणि बँका UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत.
1 मेपासून ATM वापरणं म्हणजे खिशाला झळ बसण्यासारखं ठरेल. त्यामुळे ATM पेक्षा डिजिटल व्यवहार अधिक फायदेशीर ठरतील. अजूनही जर तुम्ही ATM वर अवलंबून असाल, तर आता वेळ आली आहे डिजिटल पर्याय स्वीकारण्याची.