मित्रांनो खरेदीसाठी बहुतांश लोकांना गृहकर्ज घ्यावे लागते. मात्र कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड करताना मूळ रकमेपेक्षा खूप अधिक रक्कम व्याज म्हणून भरावी लागते. सध्या गृहकर्जावर सुमारे ८.७५% ते ९% दराने व्याज आकारले जाते.
काही लोक असा विचार करतात की जर आपण ईएमआयच्या रकमेइतकीच रक्कम म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवली, तर भविष्यात अधिक फायदा होऊ शकतो. या दोन्ही पर्यायांची तुलना करून हे गणित समजून घेऊया.
समजा तुम्ही ७७ लाख रुपये किमतीचे घर खरेदी करणार आहात. यासाठी २० टक्के म्हणजेच १५.४० लाख रुपये डाऊन पेमेंट आणि उरलेली ८० टक्के म्हणजेच ६१.६० लाख रुपयांची कर्जरक्कम लागेल. कर्जावरील व्याजदर सरासरी ८.७५% असून कर्जाची कालावधी २० वर्षांची असेल. अशा वेळी तुम्हाला मासिक ईएमआय ५५,०२७ रुपये भरावा लागेल.
या २० वर्षांत एकूण ६१.६० लाखांच्या कर्जावर सुमारे ७०.४६ लाख रुपये व्याज भरावे लागेल. त्यामुळे कर्जाची एकूण परतफेड रक्कम सुमारे १.३२ कोटी रुपये होते. डाऊन पेमेंट धरून एकूण खर्च १.४७ कोटी रुपये होतो.
आता दुसऱ्या पर्यायाकडे पाहू. जर तुम्ही दरमहा गृहकर्जाच्या ईएमआइत इतकीच रक्कम म्हणजे ५५,०२७ रुपये म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवली, आणि त्यावर सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर सुमारे ६ वर्षे ७ महिन्यांत म्हणजेच ७९ महिन्यांत तुम्ही ७७ लाख रुपयांचे लक्ष्य गाठू शकता.
या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ४३.४७ लाख रुपये असेल आणि त्यावर अंदाजे ३३.५२ लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. याचा अर्थ असा की गृहकर्जापेक्षा खूप कमी गुंतवणुकीत आणि वेळेत तुम्ही तुमचं घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.
एसआयपीमध्ये बाजाराची जोखीम असते आणि १२% परतावा निश्चित नाही. तसेच, या ६-७ वर्षांच्या कालावधीत घराच्या किमती वाढू शकतात. याशिवाय, या काळात तुम्हाला भाड्याच्या घरात राहावे लागेल. त्याउलट, गृहकर्ज घेतल्यास तुम्ही लगेच तुमच्या घरात राहायला सुरुवात करू शकता.
शेवटी, दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा आहेत. तुमचं उत्पन्न, गरजा, ध्येय आणि जोखीम घेण्याची तयारी लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.